इयत्ता - आठवी
विषय - माय मराठी
4. सुखाची चव
मध्यवर्ती कल्पना - संयम आणि प्रतीक्षेने सुखाची खरी चव आणि जीवनातील मूल्यांचे महत्त्व कळते.
लेखिकेबद्दल (अरुणा ढेरे)
डॉ. अरुणा रामचंद्र ढेरे (जन्म 1957) या एक प्रसिद्ध मराठी लेखिका आहेत. त्यांनी कविता, कथा, कादंबरी, ललित गद्य, समीक्षा आणि संशोधन अशा विविध प्रकारात लेखन केले आहे. 'उर्वशी', 'मैत्रेयी', 'महाद्वार' या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत, तर 'मंत्राक्षर', 'यक्षरात्र', 'निरंजन' हे त्यांचे कविता संग्रह आहेत. 'रुपोत्सव', 'लावण्ययात्रा', 'मनातलं आभाळ' हे त्यांचे ललित गद्य संग्रह खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.
नवीन शब्द आणि अर्थ
* मोहोर - आंब्याची फुले.
* चाहूल - काहीतरी येत असल्याची जाणीव, सूचना.
* टक्क उघडणे - पूर्ण जागे होणे.
* कुहू - कोकिळेचा आवाज.
* सार्थक - सफल होणे, यशस्वी होणे.
* हजारी मोगरा - बत्तीस मोगरा, अनेक फुले एकत्र असलेल्या मोगऱ्याच्या फुलाचा प्रकार.
* शनिवार वाडा - पुण्यातील पेशव्यांचा वाडा.
* वाळा - एक प्रकारचे सुगंधी वाळलेले गवत.
* कैरीची डाळ - कच्च्या आंब्याचे खिसून डाळीत केलेले मिश्रण (हे सहसा चैत्र गौरीत सुवासिनींना देतात).
* पन्ह - कच्च्या कैरीपासून बनवलेले पेय.
* अनिच्छेने - इच्छा नसताना.
* तृप्ती - समाधान.
* पोस्टमन इन द माउंटन - डोंगराळ भागातील पोस्टमन (टपाल वाटणारा) - एका चिनी चित्रपटाचे नाव.
प्र.1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1.थंडी केव्हा कमी होत जायची?
उत्तर - होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची.
2.पुस्तक वाचण्याची वाट पाहण्याचा काळ कोणता?
पुस्तक वाचण्याची वाट पाहण्याचा काळ उन्हाळ्याच्या आधीचा होता.
3.लेखिकेने कोणता चिनी चित्रपट पाहिला?
उत्तर - लेखिकेने 'पोस्टमन इन द माउंटन' नावाचा चिनी चित्रपट पाहिला.
4.पोस्टमनने कोणाला पत्र वाचून दाखविले?
उत्तर - पोस्टमनने एका आंधळ्या म्हातारीला पत्र वाचून दाखविले.
प्र 2. खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. सुट्टीच्या आधीचा काळ भारावलेला का असतो?
उत्तर - सुट्टीच्या आधीचा काळ भारावलेला असतो कारण परीक्षा तोंडावर असते, पण त्याचबरोबर सुट्टीतील मजा, नव्या गोष्टी वाचायला मिळणे, अंगणात झोपायला मिळणे आणि कोकिळेचा आवाज ऐकणे अशा अनेक आनंदाच्या गोष्टींची उत्सुकता मनात असते.
2. वाट पाहण्यात कोणकोणत्या गोष्टी असतात?
उत्तर - वाट पाहण्यात दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड यांसारख्या अनेक गोष्टी असू शकतात. पण त्याचबरोबर संयम, धीर, विश्वास आणि ध्यास अशा चांगल्या गोष्टीही शिकायला मिळतात.
3. पोस्टमन कोरे पत्र का वाचत असे?
उत्तर - पोस्टमन कोरे पत्र वाचत असे कारण म्हातारीचा मुलगा तिला कधीच पत्र लिहीत नसे आणि तिची चौकशी करत नसे. म्हातारी आपल्या मुलाच्या पत्राची आणि त्याच्या येण्याची वाट पाहत होती, त्यामुळे तिला आनंद वाटावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावेत यासाठी पोस्टमन कोरं पत्र वाचून दाखवत असे.
प्र.3. खालील प्रश्नाचे प्रत्येकी चार-पाच वाक्यात लिहा.
1. लेखिका सुट्टीची वाट का पाहत असे?
उत्तर - लेखिका सुट्टीची वाट पाहत असे कारण सुट्टीत त्यांना खेळायला आणि अनेक गमती-जमती करायला मिळत असत. त्यांना बालपणी आवडीच्या अनेक गोष्टी सुट्टीत मिळायच्या, जसे की गॅलरीत किंवा अंगणात झोपायला मिळणे, कोकिळेचा आवाज ऐकणे, हजारो मोगऱ्याचे झाड, बकुळीची फुले वेचणे, माठातले वाळा घातलेले पाणी, कुरड्या-पापड्यांची धाई, कैरीची डाळ आणि पन्ह, बर्फाचे गोळे किंवा उसाचा रस पिणे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना खूप नवीन गोष्टींची आणि कवितांची पुस्तके वाचायला मिळत होती, ज्यामुळे त्यांना एक वेगळे जग अनुभवायला मिळत असे.
2. वाट पाहत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी शिकतो?
उत्तर - वाट पाहत असताना आपण अनेक मौल्यवान गोष्टी शिकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण संयम शिकतो आणि धीर धरायला शिकतो. एखादी गोष्ट सहज मिळाली तर तिचे मोल कळत नाही, पण वाट पाहताना तिची खरी किंमत लक्षात येते. याशिवाय, एखाद्या गोष्टीवर विश्वास घट्ट करायला शिकतो आणि ध्येयाबद्दलचा ध्यास वाढतो.
प्र 4. संदर्भासह स्पष्ट करा.
'जे सुचलं, जे लिहावसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं !'
उत्तर - हे वाक्य लेखिकेने पुस्तक वाचताना व्यक्त केलेले आहे. लेखिका जेव्हा पुस्तके वाचत असे, तेव्हा त्यांना न पाहिलेले देश, अनोळखी माणसे आणि न अनुभवलेले प्रसंग भेटत असत. त्या गोष्टी, इतिहास आणि गाणी वाचताना त्यांना खूप नवीन अनुभव मिळत असे. त्यांना आश्चर्य वाटायचे की, ज्या लेखकांनी हे सर्व लिहिले आहे, त्यांनी त्यांच्या मनात आलेले विचार आणि कल्पना इतक्या प्रभावीपणे शब्दांत कशा उतरवल्या असतील. या वाक्यातून लेखिकेला भाषेची ताकद आणि शब्दांची जादू समजली, हे दिसून येते.
प्र 5. खालील प्रश्नाचे उत्तर सात-आठ वाक्यात लिहा.
1. सुखाची चव कशी वाढेल?
उत्तर - सुखाची चव वाढवण्यासाठी वाट पाहणे, थोडी तडफड भोगणे आणि संयम ठेवणे महत्त्वाचे आहे, असे लेखिकेला वाटते. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सहज मिळते, तेव्हा तिचे मोल कळत नाही. पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतो, त्यासाठी कष्ट करतो किंवा थोडी तडफड सहन करतो, तेव्हा ती गोष्ट मिळाल्यावर तिचा आनंद खूप मोठा वाटतो. या वाट पाहण्याच्या काळात आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, आणि त्या गोष्टीवरचा आपला विश्वास अधिक घट्ट होतो. एखाद्या ध्येयाबद्दलचा आपला ध्यास वाढतो. म्हणूनच, जेव्हा आपल्याला जे हवे आहे ते सहज मिळत नाही आणि त्यासाठी थोडी वाट पाहावी लागते, तेव्हाच सुखाची खरी चव, यशाची खरी गोडी आणि प्रेम व मायेतील खरी तृप्ती अनुभवता येते. यामुळे आयुष्याबद्दलची ओढही वाढते.
प्र 6. जोड्या जुळवा -
अ ब
1. कोकिळा 4. कुहू कुहू |
2. चिनी सिनेमा 3. पोस्टमन इन द माउंटन |
3. पोस्टमन 1. म्हातारीला पत्र |
4. संतांचे अभंग 2. करुणेचा स्पर्श |
भाषाभ्यास -
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1. वेड लागणे
* अर्थ: आवड असणे किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे.
* वाक्य: मला लहानपणी नवीन गोष्टीची पुस्तकं वाचण्याचं वेड लागलं होतं.
2. सार्थक होणे
* अर्थ: यशस्वी होणे, पूर्ण होणे, सफल होणे.
* वाक्य: कोकिळेचा आवाज ऐकल्याने लेखिकेच्या पहाटेची वाट पाहण्याचे सार्थक झाले.
3. थक्क होणे
* अर्थ: आश्चर्यचकित होणे, चकित होणे.
* वाक्य: पुस्तकात न पाहिलेल्या जगाबद्दल वाचून लेखिका थक्क झाल्या.
4. मोल समजणे
* अर्थ: किंमत कळणे, महत्त्व कळणे.
* वाक्य: वाट पाहिल्यावरच सुखाचे खरे मोल समजते, असे लेखिकेला वाटते.
टिप्पणी पोस्ट करा