इयत्ता - आठवी 

विषय - माय मराठी 

1. तो राजहंस एक 

 कवितेचा थोडक्यात अर्थ :

      या कवितेचा मध्यवर्ती विचार आत्मविश्वास हा आहे. 'कुरुप' समजल्या जाणाऱ्या एका बदकाच्या पिल्लाची गोष्ट यात सांगितली आहे, ज्याला इतर पिल्ले आणि लोक हिणवतात. पण जेव्हा त्याला कळते की तो खरं तर एक सुंदर राजहंस आहे, तेव्हा त्याचा आत्मविश्वास जागृत होतो आणि त्याचे दुःख व भीती दूर होते. बाह्य स्वरूपापेक्षा स्वतःला ओळखणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे ही कविता सांगते.

कवीबद्दल (ग. दि. माडगूळकर) :

     गजानन दिगंबर माडगूळकर (1919-1977) हे एक खूप प्रसिद्ध मराठी कवी, कथाकार, कादंबरीकार आणि पटकथा लेखक होते. त्यांना 'गदिमा' या नावानेही ओळखले जाते. त्यांची 'जोगिया', 'चैत्रबन', 'गीतरामायण' इत्यादी काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. 'आकाशाची फळे' ही त्यांची कादंबरी आणि 'वाटेवरच्या सावल्या' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यांच्या लेखनातून मराठमोळ्या जीवनाचे विविध रंग, मनातील उत्कट भावना आणि रसाळ व नाट्यपूर्ण शैली दिसते. 'गीतरामायण' लिहिल्यानंतर त्यांना 'आधुनिक वाल्मिकी' म्हणून ओळख मिळाली. त्यांनी मराठी साहित्यात खूप मोठे योगदान दिले आहे.

प्र 1. खालील प्रश्नाचे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

 1.बदकाची पिल्ले कशी होती?

 उत्तर - बदकाची पिल्ले सुंदर होती.

 2.ते पिल्लू वेगळे का तरंगत होते?

 उत्तर - ते पिल्लू इतर पिल्लांपेक्षा वेगळे दिसत होते म्हणून ते एकटेच वेगळे तरंगत होते.

 3. त्या पिल्लाला कोण विचारत नसे?

 उत्तर - त्या पिल्लाला कोणीही खेळायला विचारत नसे.

प्र 2. खालील प्रश्नाचे दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

 1.लोक हसून काय म्हणत असत?

 उत्तर - लोक त्या पिल्लाकडे बोट दाखवून हसून म्हणत असत की, ते एक कुरूप आणि वेडे पिल्लू आहे.

 2.पिल्लास कोणते दुःख होते?

 उत्तर - पिल्लाला खूप दुःख होते कारण त्याची भावंडेही त्याला विचारत नसत आणि सगळे त्याला हिणवत असत, त्यामुळे त्याला आपला कमीपणा वाटायचा.

 3. राजहंस असल्याचे पिल्लाला केव्हा कळाले?

 उत्तर - एका दिवशी पिल्लाने पाण्यात चोरून आपले प्रतिबिंब पाहिले, तेव्हा त्याला कळाले की तो खरं तर एक राजहंस आहे.

प्र.3. खालील प्रश्नाचे उत्तर पाच-सहा वाक्यात लिहा.

 1. कुरूप पिल्लास इतर पिले कशी वागणूक देत असत?

 उत्तर - कुरूप पिल्लाला इतर पिल्ले खूप वाईट वागणूक देत असत. कोणीही त्याला आपल्यासोबत खेळायला घेत नसे. ती त्याला नेहमी एकटे पाडत आणि त्याची चेष्टा करत असत. त्याला पाहून लोक हसत आणि बोट दाखवून ते कुरूप आणि वेडे असल्याचे म्हणत. त्याची स्वतःची भावंडेही त्याला विचारत नसत. सगळे जण त्याला टोचत आणि उगाच दरडावत असत, ज्यामुळे ते पिल्लू खूप दुःखी आणि घाबरलेले राहायचे.

प्र 4. खालील प्रश्नाचे उत्तर सात-आठ वाक्यात लिहा.

 1. या कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.

   या कवितेत एका अशा पिल्लाची गोष्ट आहे जे बदकाच्या पिलांबरोबर तळ्यात वाढत असते, पण ते त्यांना कुरूप वाटते. त्यामुळे कोणीही त्याला आपल्यासोबत खेळायला घेत नाही आणि ते नेहमी एकटे व दुःखी असते. लोकही त्याची चेष्टा करतात आणि त्याची स्वतःची भावंडंदेखील त्याला दुय्यम वागणूक देतात. त्यामुळे ते पिल्लू खूप रडते आणि त्याला आपला कमीपणा वाटतो. पण एके दिवशी ते पिल्लू पाण्यात आपले प्रतिबिंब पाहते आणि त्याला कळते की ते बदक नसून एक सुंदर राजहंस आहे. हे कळताच त्याची भीती आणि कमीपणाची भावना दूर होते. त्याला खूप आनंद होतो आणि त्याच्यात आत्मविश्वास येतो. ही कविता आपल्याला शिकवते की आपले बाह्य रूप कसेही असले तरी, आपल्यातील खरी ओळख आणि क्षमता आपण स्वतःच ओळखायला हवी. स्वतःवर विश्वास ठेवल्यास आपण कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो आणि आपले खरे महत्त्व जाणू शकतो.

प्र 5. संदर्भासह स्पष्टीकरण करा.

 1.आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक

   संदर्भ: ही ओळ 'तो राजहंस एक' या कवितेतील आहे. कवी ग. दि. माडगूळकर यांनी एका तळ्यात बदकांच्या पिलांबरोबर असलेल्या राजहंसाच्या पिल्लाबद्दल इथे सांगितले आहे.

   स्पष्टीकरण: या ओळीतून कवी सांगत आहेत की, एका तळ्यात अनेक सुंदर बदकाची पिल्ले होती, पण त्यामध्ये एक पिल्लू होते जे बदकाच्या पिलांना कुरूप आणि वेडे वाटत होते. त्यामुळे ती बदकाची पिल्ले त्या वेगळ्या पिल्लाला आपल्यासोबत खेळायला घेत नसत आणि त्याला एकटे पाडत असत. ही ओळ त्या पिल्लाच्या सुरुवातीच्या एकटेपणाची आणि इतरांकडून होणाऱ्या दुर्लक्षाची स्थिती दर्शवते.

 2. त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

    संदर्भ: ही ओळ 'तो राजहंस एक' या कवितेतील शेवटच्या कडव्यातील आहे. इथे त्या पिल्लाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या बदलाचे वर्णन केले आहे.

   स्पष्टीकरण: या ओळीतून कवी सांगत आहेत की, ज्या पिल्लाला आजवर सगळे कुरूप समजत होते, त्याला एके दिवशी स्वतःची खरी ओळख पटली. त्याने पाण्यात आपले प्रतिबिंब पाहिले आणि त्याला समजले की तो बदक नसून एक सुंदर आणि वेगळा राजहंस आहे. ही जाणीव होताच त्याची भीती आणि कमीपणाची भावना क्षणात नाहीशी झाली. त्याला आत्मविश्वास मिळाला आणि तो आनंदाने भरून गेला. ही ओळ आत्मओळख आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करते.

प्र 6. भाषाभ्यास

 अ) विरुद्धार्थी शब्द लिहा.

   * दुःख x सुख

   * कुरुप x सुरूप / सुंदर

   * प्राचीन x आधुनिक / अर्वाचीन

 ब) समानार्थी शब्द लिहा.

   * संग - सोबत, बरोबर

   * धाक - भीती, दरारा, जरब

   * सुरेख - सुंदर, रमणीय, छान

 क) विग्रह करून संधी ओळखा.

   * क्षणैक = क्षण + एक (स्वर संधी)

प्र 7. खालील प्रश्नाचे प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत. योग्य तो पर्याय निवडून पुढे लिहा.

 1. या कवितेत कोणत्या पक्षाचे वर्णन केले आहे?

   ड. राजहंस

 2 बदकाची पिल्ले कुठे रहात होती?

   अ. तळ्यात

 3.गीतरामायणच्या रचनेनंतर ग. दि. माडगूळकराना कोणत्या नावाने ओळखले जाते?

   ब. आधुनिक वाल्मिकी

 4. या कवितेचा काव्य प्रकार हा आहे.

   क. भावगीत

 


Post a Comment

أحدث أقدم